English

बँकेचा इतिहास

बँकेचे सरकार नियुक्त पहिले अध्यक्ष
स्व. बी.ए.दप्तरदार

स्व.हिज हायनेस
चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन

बँकेचे लोक नियुक्त पहिले अध्यक्ष स्व. रामचंद्र बाबाजी आरवाडे



इतिहास


सांगली संस्थानचे राजेसाहेब कै.हिज हायनेस चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी त्यावेळच्या प्रांतिक राज्यातील पुरोगामी सुधारणा संस्थानमध्ये कार्यान्वित आणाव्यात व प्रजाजनांची उन्नती साधावी, अशी तळमळ असल्याने ,त्या वेळच्या स्टेटमधील अनुभवी व चांगले अधिकारी घेउन केवळ ५०००/- रुपयांच्या भाग भांडवलावरती दिनांक २८ मार्च १९२७ रोजी बँकेची स्थापना केली


बँकेच्या स्थापनेपासून कै.नानासाहेब जोशी, कै. माधवराव भिडे, यांच्या सारखे मॅनेजर बँकेस लाभले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संस्थानांचे विलीनीकरण झाल्यानंतर २७ जुलै १९५० रोजी दक्षिण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून बँकेची रीतसर नोंदणी झाली व सन १९५१ साली कै. भगवंतराव दप्तरदार यांच्या अध्यक्षतेखाली सरकार नियुक्त पहिले संचालक मंडळाची निवड करणेत आली. पुढील कालावधीमध्ये सन १९५५/५६ साली बँकेच्या निवडणुका झाल्या व बँकेचे लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आले. कै रामभाऊ आरवाडे यांची चेअरमन पदी व व्हाईस चेअरमन पदी कै. गुलाबराव पाटील यांची निवड झाली.याच कालखंडामध्ये सांगली, वारणा, कृष्णा हे तीन साखर कारखाने रजिस्टर झाले. या साखर कारखान्यांच्या शेअर्स खरेदी साठी, ऊस लागवडीसाठी त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यात आला. त्या वेळी वाय.एस.बोरगांवकर यांनी बँकेचे व्यस्थापक म्हणून काम पहिले होते. त्यानंतर त्यांची रिझर्व बँकेकडे निवड झाली. त्यानंतर पी.बी.टाकवेकर यांनी सन १९५६ ते १९८६ पर्यंत व्यवस्थापक म्हणून काम पहिले. सन १९५६/५७ साली कै. गुलाबराव रघुनाथराव पाटील याची बँकेच्या चेअरमन पदी निवड झाली. त्यांनी सतत १४ वर्षे बँकेच्या चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे वाहिली.आपल्या चेअरमन पदाच्या काळामध्ये त्यांनी बँक नावलौकिकास आणली व बँकेच्या कामकाजाचा वैशिष्ठ्यपूर्ण ठसा महाराष्ट्रभर उमटविला.


१९५७ साली वखार भाग सांगली येथे बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीची कोनशिला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते बसविण्यात आली व बांधकाम वर्षभरात पूर्ण करून दिनांक २३/०२/१९५८ रोजी रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर बी. वेंकटपय्या यांच्या हस्ते व चिंतामणराव पटवर्धन राजेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन करण्यात आले.


१९६० साली सांगली जिल्हा स्वतंत्र झाला व आपली बँक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून कामकाज करू लागली. जिल्ह्यामध्ये सर्वत्र सहकारी संस्था वाढीसाठी त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती कर्जाबरोबर शेती व्यवसायासाठी व शेती वृद्धी विकासासाठीच्या मध्यम मुदतीच्या कर्ज पुरवठ्याबाबत प्राधान्याने विचार करण्याचा निर्णय बँकेने घेतला.शेती व शेतीपूरक विकासाच्या विविध योजना सर्व स्तरावरती पटवून देण्यामध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष कै. गुलाबराव पाटील यांनी अत्यंत परिश्रम घेतले व नवीन शेतीपूरक व्यवसायांच्या कर्ज योजना बँकेमार्फत राबविण्यात सातत्याने प्रयत्न केला.


१९७२/७३ सालच्या दुष्काळामध्ये वाढलेल्या थकबाकीचा अभ्यास करणेसाठी शासनाने कै.वि.म.दांडेकर,अर्थशास्त्रज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समिती मध्ये कै. गुलाबराव पाटील, कै. बाजीराव बालाजी पाटील यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतरच्या काळामध्ये शेती व्यवसायामध्ये फलोत्पादानावरती शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित करून फळांची शेती केल्यास फायद्याची व हिताची होईल हा विचार कै. वसंतदादा पाटील, कै राजारामबापू पाटील, कै गुलाबराव पाटील, डॉ.पी.एस ठाकूर व कै.वसंतराव आर्वे अशा जाणकार व्यक्तींनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविला व द्राक्ष बागांची वाढ करावी यासाठी बँकेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले.


सन १९७० ते ७६ पर्यंतच्या कालावधीमध्ये बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा कै.बाजीराव बाळाजी पाटील यांनी सांभाळली बँकेच्या संचालक मंडळामध्ये कै. गुलाबराव पाटील यांनी जवळपास २८-३० वर्षे काम केले, बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा १४ वर्षे सांभाळली.त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये त्यांनी बँकेस राज्यामध्ये आदर्श बँक म्हणून लौकिक मिळवून दिला.त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्याकीर्दीमध्ये १९७७ साली बँकेचा सुवर्ण महोत्सव तत्कालीन मुख्यमंत्री कै.डॉ.वसंतदादा पाटील व महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कै. बाळासाहेब देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


बँकेच्या आर्थिक कामाकाजाबरोबर बँकेने सामाजिक बांधिलकीची जाणीव सांभाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला त्यावेळच्या परिस्थितीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या उभारणी व स्थापनेसाठी रुपये एक लाख मात्रची देणगी देवून आपला सहभाग व्यक्त केला. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील निरनिराळ्या कॉलेजेसना इमारत बांधकाम, प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्य व ग्रंथालय उभारणीसाठीही आर्थिक मदत केली अशाचप्रकारे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसीएशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कै. विष्णूआण्णा पुरस्कारासाठी बँकेच्या वतीने २.०० लाख देवून आपला सहभाग व्यक्त केला.


सन १९८०-८१ मध्ये बँकेस आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागले त्यावेळेस बँकेस तोटा झाल्याने रिझर्व्ह बँकेने आपली बँक पुनर्वसनाखाली घेतली व बँकेचे कामकाज विषयक धोरण ठरविण्यासाठी व प्रगतीसाठी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी मा. बापटसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसन कमिटी नेमली. तत्कालीन परिस्थितीच्या अडचणीचा मुकाबला बँकेच्या संचालक मंडळाने व बँकेच्या सेवकांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केल्याने बँक एक वर्षाच्या आत पुनर्वसनातून बाहेर येवून बँकेने त्या संकटातून सोडवणूक करून घेतली यानंतर पुढील काळामध्ये बँकेच्या प्रगतीचा आलेख प्रत्येक वर्षी घोडदौड करीत आगेकूच करू लागला.


बँकेच्या कामकाजाच्या वाढत्या व्यापामुळे मुख्य कार्यालयासाठी सध्याच्या इमारतीचा कोनशिला समारंभ कै. डॉ. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. नंतर सादर प्रशासकीय मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.